नागरिकत्व सुधारणा कायद्याचे राजकारण करून
विरोधी पक्ष अत्यंत घातक खेळ करीत आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय
कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केला. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून भारतात
पळून आलेल्या हिंदू आणि शीख नागरिकांनी श्री. नड्डा यांची नुकतीच भेट घेतली या
प्रसंगी ते बोलत होते. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये धर्माच्या आधारावर होणाऱ्या
छळाला कंटाळून या नागरिकांनी 28 वर्षांपूर्वी भारतात आश्रय घेतला होता. या
नागरिकांच्या प्रतिनिधी मंडळाने मोदी सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा केंद्र
सरकारने मंजूर केल्याबद्दल नड्डा यांना धन्यवाद दिले.
या प्रसंगी श्री. नड्डा म्हणाले की पाकिस्तान,
बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांमधून भारतात आश्रय घेऊ इच्छिणाऱ्या हिंदू, शीख,
बौद्ध, जैन, ख्रिश्चन, पारसी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याबाबतच्या
प्रक्रियेला केंद्र सरकार आणखी वेग देईल यासाठी स्वतंत्र कक्ष सुरु केला जाईल. या
तीन देशांमधील अल्पसंख्य नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी जे सहाय्य लागेल
ते भारतीय जनता पक्षातर्फे केले जाईल. मतपेढीच्या राजकारणासाठी या कायद्याला
विरोधी पक्षांकडून विरोध केला जात आहे. त्यासाठी या कायद्याबद्दल मुस्लीम
धर्मीयांमध्ये भीती निर्माण करण्याचे काम केले जात आहे. केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी
समाजातील धार्मिक सलोखा नष्ट करण्याचा कुटील डाव खेळला जात आहे. या तीन देशांमधील
हिंदू, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, पारसी नागरिकांना ज्या परिस्थितीचा सामना करावा
लागतो आहे त्याकडे माणुसकीच्या नात्याने पाहिले पाहिजे.
या कायद्याविरोधात काँग्रेस नेतृत्व करत
असलेली वक्तव्ये आणि पाकिस्तानकडून केली जाणारी वक्तव्ये यात साम्य आहे.
विरोधी पक्षांकडून राजकीय फायदा मिळविण्यासाठी
मुस्लीम धर्मीयांची माथी भडकवण्याचे काम सुरु आहे. देशहितासाठी विरोधी पक्षांनी या
मुद्द्याचे राजकारण करू नये असे आवाहनही श्री. नड्डा यांनी यावेळी केले.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून भारतात आश्रय
घेतलेल्या नागरिकांच्या प्रतिनिधी मंडळात प्यारासिंग, दीदार सिंग, प्रताप सिंग,
मनोहर सिंग, खजिंदर सिंग यांचा समावेश होता. काबूल, कंदहार आणि पाकिस्तानातील
पेशावर येथून आलेले हे हिंदू आणि शीख निर्वासित दिल्लीतील टिळक नगर आणि मनोहर
नगरमध्ये रहात आहेत.

