काँग्रेस -राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्याने शिवसैनिक नाराज

राज्यातील नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना काँग्रेस
-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाने एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. तर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ
घेतली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांमध्ये
उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र काँग्रेस -राष्ट्रवादीसोबत शिवसेना
गेल्याने काही शिवसैनिक नाराज झाल्याचे समोर येत आहे. धारावी येथील 400
शिवसैनिकांनी पक्षाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला आहे. भ्रष्ट आणि विरोधी
पक्षासोबत शिवसेनेने हातमिळवणी केल्याने हे कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगण्यात
येत आहे.
भाजपात सहभागी झालेले शिवसैनिक रमेश नाडार
यांनी याविषयी माहिती दिली. शिवसेना भ्रष्टाचारी पक्षासोबत सत्तेत सहभागी झाले.
हिंदू पक्षाविरोधात शिवसेनेने हातमिळवणी केल्याने आम्हाला स्वत:ला फसवणुकीची भावना
निर्माण झाली. फक्त सत्तेसाठी शिवसेना महाविकास आघाडीत सहभागी झाली असल्याचा आरोप
त्यांनी केला. शिवसेनेत अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. मागील 7 वर्षापासून
राष्ट्रवादी आणि काँग्रेस च्या विरोधात आम्ही लढत आहोत.
निवडणुकीच्या काळात आम्ही लोकांच्या घरोघरी
जाऊन मते मागितली. पण आता त्यांना कोणते तोंडाने सामोरे जाणार? आम्ही प्रामाणिकपणे लोकांकडे मते मागितली होती अशा शब्दात रमेश नाडार
यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा-शिवसेना युती
झालेली असली तरीही मतदारसंघ सोडण्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे
मनोमिलन झाले नव्हते. यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवाराचा तर
भाजपाने शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास नकार दिला होता.
काही शिवसैनिकांनी सामुहिक राजीनामेही दिले
होते. मात्र, निकालानंतर वेगळीच गणिते आकारास आली असून
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केले.
नेमका हाच मुद्दा काही शिवसैनिकांना आवडलेला नाही. यापूर्वी रमेश सोळंकी नावाच्या
शिवसैनिकाने मंगळवारी रात्री पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.