शेतरस्त्यांचे काम होणारा महाराष्ट्रातील पहिलाच अभिनव उपक्रम
औसा मतदारसंघातील ६१
गावांतील ४१४ किलोमीटर लांबीच्या १५३ शेत रस्त्यांचे ३३ वेगवेगळ्या ठिकाणांवरून
भूमिपूजन संपन्न झाले. औसा जि. लातूर चे आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून एकाच
दिवशी आमदार निधीतून शेतरस्त्यांचे काम होण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयत्न आहे.
आ. अभिमन्यू पवार यांनी त्यांच्या स्थानिक निधीतून शेतरस्त्यांचे काम करण्याचा
निर्णय घेतला आहे.
शेतरस्त्यांचे काम
एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारा हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे. शेतरस्त्ये
नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. शेतीपूरक अवजारे व पिकवलेला
माल वाहण्यासाठी शेतरस्त्ये असणे गरजेचे आहे. शेतरस्त्यांच्या अभावामुळे
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांना या विवंचनेतून मुक्त करण्यासाठीच
शेतरस्त्यांचे काम करण्याची मोहीम हाती घेतल्याची माहिती आ. अभिमन्यू पवार यांनी
भूमिपूजन सोहळ्यात बोलताना दिली.
शेतरस्त्यांबाबतची
त्यांची संकल्पना स्पष्ट करताना आ. पवार यांनी "मतदारसंघातील शेतरस्त्यांचे
सर्वप्रथम प्रारंभिक मातीकाम व दबई काम आमदार निधीतून करण्यात येईल.
पुन्हा शेतरस्त्यांवर
अतिक्रमण होऊ नये म्हणून त्यानंतर पावसाळ्याच्या सुरुवातीला या रस्त्यांच्या
दोन्ही बाजूला सामाजिक वनीकरण विभागाच्या मदतीने चिंच,
वड,
जांभूळ अशी झाडे लावली जाणार
आहेत. सदरील रस्त्यांचे खडीकरण व मजबुतीकरण मनरेगा योजनेअंतर्गत करण्यात येणार असल्याची
माहिती यावेळी दिली. खेड्यापाड्यातील बहुतांश तक्रारी या शेतरस्त्यांच्या निगडीतच
असतात. त्यामुळे शेतरस्त्यांचे विषय मार्गी लागल्यास पोलीस आणि महसूल विभागांवरील
ताण कमी होईल असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी लातूरचे
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. अरविंद लोखंडे, जिल्हा परिषद लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी
अभिनव गोयल, औसाचे
उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, नायब तहसीलदार श्री. कानडे, गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ,
औसा सार्वजनिक बांधकाम
उपविभागाचे उपविभागीय अभियंता जयंत जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष सुभाष जाधव,
संतोष मुक्ता,
सरपंच छायाबाई कोळपे,
उपसरपंच शाहुराज कोळपे,
माजी जि. प. सदस्य प्रकाश
पाटील, प्रभाकर
कोलपाक, दत्तात्रेय कोळपे,
सरपंच विकास नरहरे,
प्रा. शिवरुद्र मुरगे,
सुधीर कोळपे,
मनोज थोरमोटे,
रंगनाथ खंदाडे आदी उपस्थित
होते.

