आ. अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला ५० दिवस
उलटून गेले असतानाही पोलिसांनी साधा एफआयआर देखील दाखल केला नाही. तसेच दिशा
सालियनाच्या आत्महत्येनंतर ५० दिवसांनी या संदर्भातील माहिती असल्यास ती आम्हाला
द्यावी असे प्रसिद्धीपत्रक पोलिसांनी काढले. यामुळे या दोन्ही प्रकरणांची चौकशी
करणाऱ्या अधिकाऱ्यांची भुमिका तसेच मुंबई शहराचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांचीही भुमिका हलगर्जीपणाची राहिली असल्याचे
स्पष्ट होत आहे, म्हणूनच सुशांत सिह आत्महत्या प्रकरणाचा तपास विशिष्ट टप्प्यावर
येईपर्यंत पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी आ.
अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठविलेल्या पत्रात
भातखळकर म्हणतात की आता केंद्र सरकारने सुशांत सिह राजपूत आत्महत्येचा तपास
केंद्रीय गुन्हा अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे दिला आहे. आपण एबीपी माझाच्या
मुलाखतीत व्यक्त होताना असे म्हणाला होतात की, सीबीआय काय इंटरपोलने जरी चौकशी
केली तरी आमची काही हरकत नाही. त्यामुळे राज्य सरकार सीबीआय चौकशीमध्ये कोणत्याही
प्रकारची आडकाठी आणणार नाही असा विश्वास वाटतो. शिवाय त्यामुळे राज्य सरकारची
प्रतिमा सुधारण्यास मदतच होईल.
